परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा 'कागदी' कारवाईचा धडाका? कारवाई केवळ नावापुरतीच; मावा-गुटक्याची खुलेआम विक्री सुरूच!

परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा 'कागदी' कारवाईचा धडाका? 

कारवाई केवळ कागदावरच नावापुरतीच; मावा-गुटक्याची खुलेआम विक्री सुरूच!

परभणी /टिळक रत्न प्रतिनिधी:  अन्न व औषधी प्रशासनाच्या राज्य आयुक्तपदी श्री तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार केलेल्या कारवाया पाहून अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईच्या भीतीने जिल्ह्यातील पानपट्ट्या बंद झाल्याचे चित्र उभे केले गेले होते. मात्र, प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जमिनीवर उतरून कोणतीही ठोस कारवाई केल्याचे अद्यापपर्यंत तरी दिसून आलेले नाही. प्रशासनाचा हा तथाकथित धडाका केवळ कागदावरच मर्यादित आहे की काय? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

सुगंधित मावा आणि गुटक्याची खुलेआम विक्री

​वास्तविक पाहता, आजही परभणी शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागांत परिस्थिती 'जैसे थे' आहे. कच्च्या सुपारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित पदार्थ आणि आरोग्याला घातक असणारे तंबाखूजन्य पदार्थ मिक्स करून 'मावा' आणि 'गुटका' खुलेआम तयार केला जात आहे आणि त्याची छुप्या व उघड मार्गाने विक्री सुरूच आहे. तरुणाईला व्यसनाच्या गर्तेत ढकलणारे हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असतानाही प्रशासन मात्र ढिम्म आहे.

'कर्तव्यदक्ष' अधिकारी कुठे गायब?

​तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला लगाम घालण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. मात्र, परभणीतील हे तथाकथित 'कर्तव्यदक्ष' अन्न सुरक्षा अधिकारी प्रत्यक्षात कारवाई करताना कुठेच दिसून येत नाहीत.  वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्या नंतर देखील डोळे झाकून घ्यायचे, माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क करून माहिती घेतली असता त्यांना खाजगी मध्ये उत्तर मिळाले की आता आमची तक्रार करा काय करू शकतो आम्ही याच्याशिवाय अशीच काहीशी कार्यपद्धती सध्या पाहायला मिळत आहे.

नागरिकांमधून तीव्र संताप

​सार्वजनिक आरोग्याशी आणि तरुण पिढीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या बेकायदेशीर व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु, अधिकाऱ्यांच्या या सुस्त आणि ढिसाळ कारभारामुळे परभणीकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, "हे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमकी कोणाची पाठराखण करत आहेत?" असा प्रश्न  आता नागरिक विचारत आहे.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न