रमजान काळातही स्वच्छतेकडे दुर्लक्ष; अन्न व औषधी विभागाच्या नोटिसांनंतरही विक्रेत्यांची ‘जैसे थे’ स्थिती
रमजान काळातही स्वच्छतेकडे दुर्लक्ष; अन्न व औषधी विभागाच्या नोटिसांनंतरही विक्रेत्यांची ‘जैसे थे’ स्थिती
परभणी, दि. ९ (टिळक रत्न प्रतिनिधी): पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असताना स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने साप्ताहिक टिळक रत्न यांच्या मागणीनुसार काही दिवसांपूर्वी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटीस बजावून स्वच्छता नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या कारवाईनंतरही अनेक विक्रेत्यांच्या कामकाजात कोणताही ठोस बदल झालेला दिसून आलेला नाही.
शहरातील विविध भागातील हॉटेल, नाश्ता केंद्रे व रमजान निमित्त उभारण्यात आलेल्या खाद्य स्टॉलची पाहणी केली असता, अन्नपदार्थ उघड्यावर ठेवणे, स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष, हातमोजे व हेडकॅपचा अभाव तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आली. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या बाबीकडे संबंधित विक्रेते गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट झाले.
अन्न व औषधी विभागाने नोटीस देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रमजान काळात रोजेदार नागरिक मोठ्या विश्वासाने बाहेरून खाद्यपदार्थ खरेदी करतात. त्यामुळे अन्नाची गुणवत्ता व स्वच्छता राखणे ही विक्रेत्यांची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, जनहिताच्या दृष्टीने अन्न व औषधी प्रशासनाने नियमित तपासण्या वाढवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Comments
Post a Comment