भारताने लॉक डाउनचा धाडसी निर्णय त्वरित घेतला खूप बरे झाले ...अन्यथा...- डब्ल्यू एच ओ विशेषदूत डेव्हिड नाबारो
भारताचा दळणवळण बंदीचा निर्णय धाडसी आणि दूरदृष्टीचा !...तसे केले नसते तर आज चित्र फार भयानक असते – डेव्हिड नाबारो, विशेष दूत, जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या रुग्णांची संख्या अल्प असतांनाच भारतात दळणवळण बंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे लोकांमध्ये अस्वस्थततेची भावना असणे स्वाभाविक आहे; पण सरकारने घेतलेला हा निर्णय खरोखरच धाडसी आणि दूरदृष्टीचा होता, असे कौतुकवजा विधान जागतिक आरोग्य संघटनेचे कोव्हिड-१९ आजाराविषयीचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी केले.नाबारो पुढे म्हणाले, दळणवळण बंदीच्या निर्णयामुळे संपूर्ण देशाला स्वतःच्या शत्रूची कल्पना आली. हा विषाणू आपल्यामध्येच कुठेतरी दडलेला आहे, हे लोकांना समजले. यामुळे कोरोनाच्या संक्रमणाची साखळी मोडण्याची सिद्धता करण्यासाठी स्थानिक पातळीवर वेळ मिळाला. या निर्णयामुळे रोजंदारीवर काम करणार्या गरिबांची मोठी हानी झाली असून एक प्रकारे त्यांनी बलीदानच केले आहे. प्रारंभीच पावले उचलली गेली नाहीत, तर हा विषाणू पसरतो आणि नंतर त्याला रोखणे कठीण होते. भारत हा उष्ण प्रदेशातील देश असून येथील नागरिकांची रोग प्रतिकारकशक्ती अधिक आहे. त्यामुळेच भारतीय कोरोनाला नक्कीच हरवतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. सध्या तरी कोरोना नष्ट होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

Comments
Post a Comment