दोन वर्ष जनसेवेची, 'महाविकास' आघाडीची, लोककलेच्या माध्यमातून आजपासून जिल्ह्यात होणार जागर
दोन वर्ष जनसेवेची, 'महाविकास' आघाडीची, लोककलेच्या माध्यमातून आजपासून जिल्ह्यात होणार जागर
औरंगाबाद / प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी शासनमान्य यादीवरील लोककला पथकांमधील तीन पथकांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास' आघाडीची’ या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शासनमान्य यादीवरील 22 लोककला पथकांना पटकथेसह सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. त्यातील शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, औरंगाबाद, भारूडरत्न निरंजन भाकरे आणि मंडळ, मु. पो. रहिमाबाद, ता. सिल्लोड आणि लोकजागृती बहुउद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था, औरंगाबाद या लोककला पथकांची पथनाट्य सादरीकरणासाठी औरंगाबाद जिल्ह्यासाठी निवड केली आहे. 9 मार्च, 2022 पासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लोककलेच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाणार असून पहिल्या टप्प्यात 15 मार्चपर्यंत 63 कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. प्रत्येक कलापथक 21 कार्यक्रमांचे सादरीकरण करणार आहेत. त्यात जिल्हा मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समित्या, गाव जत्रा, आठवडे बाजार, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर, आठवडे बाजार आदी ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. कलापथकाव्दारे सादरीकरण करणाऱ्या संस्था व तालुके शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, औरंगाबाद (औरंगाबाद, फुलंब्री, पैठण), भारूडरत्न निरंजन भाकरे आणि मंडळ, मु. पो. रहिमाबाद, ता. सिल्लोड (सिल्लोड, सोयगाव व कन्नड) आणि लोकजागृती बहुउद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था, औरंगाबाद (खुलताबाद, गंगापूर, वैजापूर) या संस्थांकडून सादर होणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चिलवंत यांनी केले आहे.
Comments
Post a Comment